पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आली उघड्यावर काम करण्याची वेळ
वाघोली पोलीस ठाण्याचे विदारक चित्र; इमारतीचे काम कधी सुरु होणार?

वाघोली : (मोहन कदम) वाघोली पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपल्या कर्तव्याचं पालन करत असल्याचं विदारक चित्र समोर आलं आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र तत्पर असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्यांना कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने उघड्यावर कामकाज करावं लागत आहे. यामुळे पोलिसांची कार्यक्षमता आणि मनोबल खच्चीकरण होत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून वाघोली पोलीस ठाण्याची अवस्था सुधारावी, अशी मागणी होत आहे.
अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या स्वतंत्र वाघोली पोलीस स्टेशनचे उद्घाटन दि. ११ ऑक्टोबर २४ रोजी केसनंद फाटा येथे करण्यात आले. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत पुणे शहरातील नवीन सात पोलीस स्टेशनसह वाघोली पोलीस स्टेशनचे ऑनलाईन उदघाटन झाले होते. वाघोली पोलीस स्टेशन स्वतंत्र आणि पुणे शहरात समावेश झाल्यानंतर लवकरच इमारतीचे काम सुरु होईल असे नागरिकांना वाटले होते. परंतु अद्यापही पोलिसांसह येणाऱ्या तक्रारदारांना सुद्धा कुठल्याही सुविधा उपलब्ध नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वाघोली, भावडी, केसनंद, मांजरी खुर्द, आव्हाळवाडी, बकोरी ही गावे समाविष्ट करण्यात आली. वाघोली पोलीस स्टेशन अंतर्गत तीन लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या सुरक्षिततेसाठी पोलीस स्टेशनला अधिकाऱ्यांसह एकूण ११६ कर्मचारी मिळणार असल्याचा उहापोह करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात तेवढी संख्या देण्यातच आली नसल्याने पोलिसांवर कामाचा ताण देखील वाढला आहे.
रात्रंदिवस सामान्य जनतेच्या सुरक्षिततेची काळजी करणाऱ्या खाकी वर्दीला स्वतःबरोबरच कुटुंबाची काळजी घ्यायला वेळ मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव आहे. तासंतास कर्तव्य बजावत असताना आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे पित्त, उच्च रक्त दाब, सांधे दुखी, मणक्याचे आजार, संगणकावर काम करणाऱ्यांना काच बिंदू, मोती बिंदू सारखे आजार, मधुमेह, हृद्य विकार, पोट दुखी आदी आजारांना सामोरे जावे लागत आहे. खाण्यापिण्याच्या अनियमिततेमुळे त्यांच्या जीवन शैलीवर त्याचा परिमाण होत असून रोजच्या ताणतणावामुळे त्यांची मानसिकता ढासळत आहे. त्यातच अपुऱ्या सुविधा असल्याने उघड्यावर कामकाज करण्याची वेळ आली आहे.
अपुऱ्या जागेमध्ये कामकाज केले जाते. लवकरच पोलीस ठाण्याच्या इमारतीचे काम सुरु होणे गरजेचे आहे. अपुऱ्या जागे अभावी पोलिसांना विना छताखाली कामकाज करावे लागत आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे.
वाघोली पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारीवर्ग अतिशय हलाखीच्या परिस्थितीत काम करतांना दिसून येत आहेत. जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिसांचीच सुरक्षा वार्यावर असल्याचे दिसून येते. पोलीस कर्मचाऱ्यांना बाहेर उघड्यावर कामकाज करावा लागत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. प्रशासनाने तात्काळ पोलीस ठाण्याची अवस्था सुधारणे गरजेचे आहे.
– ओंकार तुपे (उपजिल्हाप्रमुख, उबाठा, युवासेना, पुणे)