महड विषबाधा कांड मधील आरोपीला जन्मठेप
अन्नातील विषबाधेमुळे चार बालकांसह एका इसमाचा झाला होता मृत्यू

पुणे : महड विषबाधा कांड मधील आरोपी प्रज्ञा उर्फ ज्योती सुरेश सुरवसे हिला पनवेल जिल्हा दिवाणी सत्र न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे. खालापूर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे व त्यांच्या पथकाने अतिशय बारकाईने आणि चातुर्य पूर्वक तपास करून मृतांना न्याय मिळवून दिल्याने पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे व त्यांच्या पथकाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.याबाबत माहिती अशी की, अष्टविनायकाची पुरातन ख्याती असलेल्या महाड गावात दिनांक १८ जून २०१८ रोजी सुभाष रामचंद्र माने (रा. महड) यांचे घरात वास्तुशांतीचा कार्यक्रमानिमित्त जेवण ठेवण्यात आले होते. त्याच गावात अन्नात विषबाधा झाल्याने पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर ७० ते ८० जणांना विषबाधेने ग्रासले होते. कौटुंबिक वादातून सासु, पती, सासूची बहिण, तिचा नवरा आणि नणंद यांना संपविण्याच्या हेतूने सासूच्या बहिणीच्या घरी, सुभाष माने यांच्या वास्तूशांतीचा मुहूर्त साधत आरोपी हिने संधी साधून जेवणात विष मिसळले होते. आरोपी प्रज्ञा उर्फ ज्योती सुरवसे हिने हे कृत्य करण्यापूर्वी घरचे नातेवाईक आधीच जेवण उरकून बसले होते. त्यामुळे संध्याकाळी जेवलेल्या पाहुण्यांनी विषमिश्रित अन्नाचे सेवन केले आणि एकच खळबळ माजली होती.
जेवणामध्ये विषबाधा झाल्याने चार बालके व एक इसम यांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेक लोकांना उलट्या होत होत्या. डाळीमध्ये फोरेट सारख्या औषध पडल्यामुळे विषबाधा झाली असावी असा सुरुवातीला सर्वांना अंदाज होता. परंतु खालापूर पोलिसांना संशय आल्याने हे प्रकरण वेगळ्या पद्धतीने तपासायचे ठरवले होते. दरम्यान नव्यानेच खालापूर पोलीस ठाण्याचा कार्यभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह महड गावात घटनास्थळी धाव घेतली. कुठही विलंब न करता गावकऱ्यांच्या मदतीने सदर ठिकाणी जेवण केलेल्या लोकांना झोपेतून उठवून तात्काळ हॉस्पिटलला दाखल केले होते. त्यावेळी डॉ. रणजीत मोहिते यांनी अनेक रुग्णांवर उपचार करून त्यांचे प्राण वाचवले. अतिशय गंभीर असणाऱ्या रुग्णांना कामोठे येथील महात्मा गांधी रुग्णालयात हलवले होते. डॉक्टरांच्या अथक परिश्रम आणि प्रयत्नांनंतरही कल्याणी प्रकाश शिंगुडे (वय ७ वर्षे). ऋषीकेश शाहुराज शिंदे (वय १२ वर्षे) प्रगती श्याम शिंदे (वय १३ वर्षे), विजय श्याम शिंदे (वय ११ वर्षे) गोपीनाथ संभाजी नापुरे (वय ५३ वर्षे) या पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला होता. सदर घटनास्थळी तात्कालीन अन्न पुरवठा मंत्री नामदार गिरीष बापट यांनीही भेट देऊन पाहणी केली होती. त्याबरोबर सदर घटनेनंतर रायगडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी घटनास्थळी भेट देवून तपास कामी बहुमोल मार्गदर्शन केले होते.
हा प्रकार अपघाताने अन्नामध्ये विषबाधा झाल्याने घडलेला नसून घातपात असल्याचा पोलीसांना संशय आल्याने अतिशय बारकाईने आणि चातुर्य पूर्वक तपास करत यामध्ये आरोपी निष्पन्न करून खून करणे, खुनाचा प्रयत्न करणे, विषबाधा आदी भा.द.वि. कलमानुसार गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक करण्यात आली होती.
पनवेल सत्र न्यायालयाने संपरिक्षा पूर्ण करुन गुन्ह्यांच्या अनुषंगाने निकाल जाहीर केला. त्यामध्ये महिला आरोपी प्रज्ञा सुरवसे हिला खुनामध्ये जन्मठेप व रुपये २५ हजार दंड. खुनाचा प्रयत्न करणे यामध्ये जन्मठेप व २५ हजार रुपये दंड, विषबाधा मध्ये १० वर्षे शिक्षा व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सदर गुन्ह्याच्या तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांनी केला होता. गुन्ह्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अंबिका अंधारे, पोलीस हवालदार नितीन शेडगे, पोलीस हवालदार हेमंत कोकाटे, पोलीस हवालदार नेहा जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते. तर स्वप्निल पानसरे व दीक्षा राठोड यांनी न्यायालयात पैरवी अधिकारी म्हणून चोख कामगिरी बजावली. तसेच पनवेल सत्र न्यायालयामध्ये सरकारी पक्षातर्फे अॅड. सी. वाय. पाटील यांनी भक्कमपणे बाजू मांडली.
पोलिसांनी हाताळले अतिशय कुशलतेने प्रकरण
महड विषबाधा प्रकरणी पोलिस पाटलांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून घेतल्यानंतर खालापूर, महड परिसरात कायदा सुव्यवस्था, शांतता राखण्यापासून ते आरोपी अटक करण्यापर्यंत अत्यंत जोखमीचे काम होते. पोलिसांनी अतिशय कुशलतेने प्रकरण हाताळले. आरोपी निष्पन्न करून हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या प्रज्ञा सरवदे हिला २२ जुनला अटक करून काटेकोरपणे तपास केला. गुन्ह्यातील बारकावे ते सक्षम पुरावे, फॉरेन्सिक लॅब, अन्न व औषध प्रशासन टीम, न्यायालयात योग्य माहिती सादर करण्यापासून ते स्थानिक राजकीय, सामाजिक घटनांवर नियंत्रण ठेवण्यास पोलिसांचा कस लागला होता.
खालापूर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे व यांच्या पथकाने महड विषबाधा कांड मधील केलेला तपास कौतुकास्पद आहे. गुन्ह्यांमध्ये असा प्रामाणिकपणे तपास केल्यास गुन्हेगारांना शिक्षा मिळेल आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल व गुन्हेगार गुन्हा करण्यासाठी धजावणार नाहीत. – राजेंद्र सातव पाटील
पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे व त्यांच्या पथकाने मृतांना न्याय मिळवून देण्यासाठी अतिशय बारकाईने आणि चातुर्य पूर्वक तपास केला आहे. मृतांना न्याय मिळवून देण्याबरोबरच पोलीस दलाची प्रतिमा उंचावून जनसामान्यांमध्ये पोलीसाबद्दलची विश्वासहर्ता निर्माण केली आहे. पोलीस निरीक्षक विश्वजित काइंगडे व त्यांच्या पथकाची कामगिरी कौतुकास्पद आहे. – अॅड. शरद बांदल