Video : मद्यधुंद डंपर चालकाने पदपथावर झोपलेल्या नऊ जणांना चिरडले

वाघोलीतील हृदयद्रावक घटना; दोन चिमुकल्यांसह एकाचा मृत्यू तर सहाजण गंभीर जखमी; पारधी समाजाच्या वतीने रास्तारोको

वाघोली वाघोली येथे केसनंद फाट्यावर हृदयद्रावक घटना घडली असून मद्यधुंद डंपर चालकाने पदपथावर झोपलेल्या नऊ जणांच्या अंगावर गाडी घातल्याची भीषण घटना रविवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात दोन चिमुकल्यांसह एकजण मृत्यु झाला तर सहा जण जखमी आहेत. वाघोलीतील हृदयद्रावक घटनेने वाघोलीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. डंपर चालकावर गुन्हा दाखल असून वाघोली पोलीसांनी अटक केली आहे.

विशाल विनोद पवार (वय २२), वैभवी रितेश पवार (वय १), वैभव रितेश पवार (वय २) असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर जानकी दिनेश पवार (वय २१), रिनिशा विनोद पवार (वय १८), रोशन शशादू भोसले (वय ९), नगेश निवृत्ती पवार (वय २७), दर्शन संजय वैराळ (वय १८), आलिशा विनोद पवार (वय ४७) असे जखमी झालेल्यांची नावे असून मृत व जखमी सर्व अमरावती जिल्ह्यातील आहेत. 

डंपर चालक गजानन शंकर तोटरे (वय २६ मूळ रा. नांदेड, सध्या रा. केसनंद) याला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी अपघात स्थळावरून व वाघोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास पुण्याहून केसनंद रोडकडे (एमएच १२, व्ही एफ ०४३७) चालक मद्यधुंद अवस्थेत बिल्डवेल्स इंटरप्राईजेस कंपनीचा डंपर घेवून जात होता. दरम्यान केसनंद फाट्यावर पदपथावर व बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत रात्रीच्या वेळेस मजूर झोपले होते. तोटरे याने डंपर सरळ पदपथावर झोपलेल्या मजुरांच्या अंगावर घातल्याने मजूर या डंपरखली चिरडले गेले आणि डंपर पुढे जाऊन झाडाला धडकला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यासह रात्रगस्तीवर असलेले पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना प्राथमिक उपचारासाठी वाघोली येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. डंपर चालकास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला.

नऊपेक्षाही अधिक गेले असते चिरडल्या   

वाघोली पोलीस, वाहतूक पोलीस, महसूल व परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पुणे-नगर रोड मृत्यूचा सापळा बनला आहे. जड, अवजड वाहने सर्रास नियमांचे उलंघन करून बिनधास्तपणे क्षमतेपेक्षा जास्त मालाची (दगड, खडी, क्रश सॅन्ड) वाहतूक करता. हे सगळ काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने आलबेल सुरु आहे. केसनंद चौकात अगदी पोलीस स्टेशन समोरच रात्रीच्यावेळी चेक पोस्ट असतो. त्याच्या पाचशे फुट अंतरावर एकदम सोमोरच हा भीषण अपघात झाला आहे.  

पदपथावर तसेच रिकाम्या जागेत अनेक मजूर झोपले होते. झोपलेल्या मजुराला चिरडत डंपर पुढे असलेल्या झाडावर जाऊन धडकला. अन्यथा डंपर सरळ मोकळ्या जागेत गेला आला असता तर त्याठिकाणी झोपलेल्या अनेक निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला असता. त्याच पदपथावर जवळ लघु व उच्च दाबाची विद्युत वाहिन्यांचे खांब आहेत. विद्युत खांबाला डंपरची धडक बसली असती तर अजून अतिशय मोठी दुर्घटना घडली असती मात्र सुदैवाने घटना टळली असे नागरिकांनी सांगितले.   

विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मृतांच्या नातेवाईकांची भेट 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर आबा कटके, राष्टवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, माजी उपसरपंच समीर आबा भाडळे, भाजप युवा मोर्चा हवेली तालुकाध्यक्ष अनिल सातव पाटील, भीम आर्मीचे सतीश ढोले, सामाजिक कार्यकर्ते सुनील (चाचा) जाधवराव, हवेली तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेश सातव पाटील, माजी नगर सेविका राजश्री काळे, आदिवासी पारधी समाज संघटनेचे मतीन भोसले, नामदेव भोसले, कॉंग्रेसच्या सीमा गुट्टे आदींनी घटनास्थळी जाऊन मृतांच्या नातेवाईकांची भेट घेतली. मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत तसेच जखमींना वैद्यकीय मदत देण्यात यावी अशी मागणी केली. तसेच दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली.

पारधी समाजाच्या वतीने रास्तारोको 

वाघोली येथील डंपरने चिरडून झालेल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाघोली येथे भेट घेतली. मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची शासकीय मदत तर जखमींना खर्च करण्याचे आश्वासन देवून अजित पवार निघून गेल्यानंतर पारधी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी केसनंद फाटा चौकात विविध मागण्यांसाठी रास्तारोको केला. यामध्ये मृतांच्या नातेवाईकांना पंचवीस लाख रुपयांची मदत मिळावी, नातेवाईकाना शासकीय नोकरीत सामावून घ्यावे, समाजाचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे, मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी वेळ द्यावी, आदी विविध मागण्या करण्यात आल्या. अचानक केलेलया रास्ता रोकोआंदोलनामुळे नगर रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ झाली.

येरवडा परिमंडळ चारचे उपायुक्त हिंमत जाधव यांच्यासह वाघोली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी केसनंद फाट्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलन कर्त्यानी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याची मागणी केली. उपायुक्त हिम्मत जाधव यांनी उपमुख्यमंत्र्यांशी बोलून पारधी समाज बांधवांची भेट घालून दिली. यावेळी पुणे महानगरपालिकेच्या  माजी नगर सेविका राजश्री काळे, आदिवासी पारधी समाज संघटनेचे मतीन भोसले, नामदेव भोसले यांचेसह पारधी समाज बांधव उपस्थित होते.

वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता वाहन चालक अवजड वाहने अतिशय बेदरकारपणे चालवतात. मद्यधुंद चालकाने नऊ निरपराधांना चिरडले ही अतिशय दु:खद घटना आहे. परिवहन विभागाने नियमांची कडक अंमलबजावणी केल्यास निरपराध लोकांना जीवाला मुकावे लागणार नाही.

– दिलीप वाल्हेकर  (हवेली तालुकाध्यक्ष, अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस)

वाघोलीतील वाहतूक कोंडी जीवनमरणाची झाली आहे. नऊ जणांना चिरले ही अतिशय मन हेलावणारी घटना आहे. कमी वयाचे, वाहन चालवण्याचा परवाना नसलेले अवजड वाहने चालवत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहन चालकांकडून नियमांचे उलंघन होत आहे. वेळीच उपाययोजना केल्या नाहीतर राष्ट्रवादी कॉंग्रेस (एसपी) पक्षाच्या वतीने रास्तारोको करून तीव्र आंदोलन करण्यात येईल.

– प्रकाश जमधडे  (उपाध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस हवेली तालुका, एसपी गट)

unnamed (4)
20210627_223433_0000
2021-07-11 (2)

Related Articles

Back to top button

You cannot copy content of this page