माऊली कटकेंच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने काम करणार – प्रदीप कंद
कंद यांच्या अर्ज माघारीनंतर माऊली कटके यांचा विजयाचा मार्ग सुखकर; परिवर्तनासाठी महायुतीची वज्रमुठ

शिरूर : शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे राजकीय पटलावर अविश्वसनीय घडामोडी घडल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रयत्नांमुळे महायुतीच्या गोटात एकजुट निर्माण झाली आहे. अर्ज माघारीच्या (४ नोव्हेंबर) अखेरच्या दिवशी भाजपचे प्रमुख दावेदार प्रदीप कंद यांनी अर्ज मागे घेतले आहे. या निर्णयामुळे महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर (आबा) कटके यांचा विजयाचा मार्ग अधिकच सोपा झाला आहे.
महायुतीची एकजूट आणि प्रदीप कंदांची भूमिका
अर्ज माघारीनंतर बोलताना प्रदीप कंद यांनी स्पष्ट केले की, महायुतीशी एकनिष्ठ असून वरिष्ठांच्या आदेशानुसार अर्ज मागे घेतला आहे. माऊली कटके यांच्या प्रचारासाठी पूर्ण ताकदीने उतरून महायुतीसाठी काम करणार आहे. कंद यांच्या माघारीने कटके यांच्या प्रचारात नवचैतन्य निर्माण झाले असून हवेलीतील मुख्य राजकीय वजनदार नेता आता प्रचारात उतरल्याने कटके यांची विजयाकडे घौडदौड सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.
श्रावणबाळ विरुद्ध कार्यसम्राट
शिरूर हवेली मतदारसंघात आता मुख्य लढत विद्यमान आमदार अशोक पवार आणि महायुतीचे उमेदवार माऊली कटके यांच्यात रंगणार होणार आहे. माऊली कटके हे श्रावणबाळ आणि जनसेवक म्हणून परिचित असून विकास कामांसह, माणुसकी असलेला, गर्व व एकलकोंडा नसलेले माऊली कटके यांच्याविषयी जनसामान्यांमध्ये आपुलकी व जिव्हाळा आहे. त्यांच्या विरोधात विद्यमान आमदार अशोक पवार हे विकास कामांमुळे कार्यसम्राट म्हणून ओळखले जातात. ही निवडणूक दोन नेत्यांमध्ये चुरशीची होणार आहे.
महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारासाठी मैदानात
अर्ज माघारीनंतर महायुतीचे एकवटलेले बळ आणि एकनिष्ठता पुन्हा सिद्ध झाली आहे. कंद यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे महायुतीचे सर्व नेते, कार्यकर्ते आता कटके यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.
प्रदीप कंद यांनी जिंकले वरिष्ठांचे मन
राजकारणात पदासाठी पक्ष बदलणारी प्रसंगी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणारे उमेदवार दिसत असले तरी प्रदीप कंद हे सुसंस्कृत,आज्ञाधारी, पक्षनिष्ठ तसेच वरिष्ठांच्या शब्दाला मान देत स्वतःच्या स्वप्नांना तिलांजली देत पक्षादेश व पक्षशिस्त पाळणारे नेतृत्व असल्याने प्रदीप कंद यांची माघारी म्हणजे माऊली कटके यांची विजयाची नांदी ठरणार असून प्रदीप कंदांनी वरिष्ठांसह, महायुतीच्या सर्व घटक पक्षातील कार्यकर्ते यांच्यासह नागरिकांचे मन जिंकले आहे. देवेंद्र फडणवीस कंद यांना योग्य संधी देणार असल्याने कंद यांनी माघार घेतली आहे. प्रदीप दादा कंद यांची माघार कटके यांचे मताधिक्य वाढविणारी असल्याने प्रतिस्पर्धी यांच्या मनात धडकी भरवणारी ठरणार आहे.
शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात जनतेने महायुतीचा विजय अनुभवण्याची तयारी सुरू केली असून, माऊली कटके यांच्या नेतृत्वात महायुतीची वज्रमूठ अधिक बळकट होत चालली आहे.