वडगावशेरीचे आमदार कुठल्या तोंडाने मते मागणार
खासदार सुप्रिया सुळे यांचा घणाघात
लोहगाव : वडगावशेरीचे आमदार कुठल्या तोंडाने मते मागणार? त्यांच्या दोन्ही हातावर खून आहेत. गुन्हेगार आहेत हे लोक आणि म्हणतात मी काही केले नाही. पोलीस स्टेशन, ससून रुग्णालयात कोणी फोन केले, प्रकरण दाबण्याचा कोणी प्रयत्न केला, महाराष्ट्र प्रश्न विचारतोय, हक्क मागतोय, मृतांची आई हक्क मागते. पोर्शे कार अपघातात देवेंद्र तुम्हाला उत्तर द्यावे लागेल. मी एक लोकप्रतिनिधी म्हणून नाही तर एक आई म्हणून सरकारला जाब विचारते असा घणाघात आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
वडगावशेरी मतदार संघातील लोहगाव येथे सुनील खांदवे-मास्तर यांच्या जनसंपर्क कार्यालय उद्घाटनानंतर झालेल्या कार्यक्रमात सुळे बोलत होत्या. यावेळी त्यांनी स्थानीक आमदार सुनील टिंगरे व महायुतीवरच्या कारभारवर जोरदार टीका केली.
सुळे म्हणाल्या, खोके सरकार भ्रष्ट सरकार असून महागाई वाढवत आहे अशा सरकारला हद्दपार करा. राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसलात. त्यामुळे देवेंद्र तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांची माफी मागितली पाहिजे. अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक यांना तुम्ही अटक केली. पण देशमुखांवर काहीही आरोप सिद्ध झाले नाहीत.
पोर्शे कार अपघातातील आरोपीला वाचविण्यासाठी रक्त बदलण्याचे पाप केले. आरोपीला पिझ्झा, बिर्याणी खायला दिली. अशी मस्ती घरी दाखवा. पोलीस स्टेशन म्हणजे तुमच्या घराचा डायनिंग टेबल नाही. पोर्शे कारने खून केलेल्या निष्पाप दोन जणांच्या आई-वडिलांचे अश्रू पुसायला तुम्ही जाणार आहात का? असा सवाल सुळे यांनी आमदार सुनील टिंगरे यांना विचारला. मृतांच्या आईला न्याय देण्यासाठी मी वडगावशेरीच्या आमदारा विरुद्ध जंग जंग पछाडून न्याय दिल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. अशा प्रवृतींना घरी बसविण्याची जबाबदारी वडगावशेरीवाल्यांवर आहे अशी सडकून टीका त्यानी केली.
त्या म्हणाल्या, बोपदेव घाटात सामूहिक अत्याचार झाला. अशा घटना वारंवार होत आहेत. वर्षातील ३६५ दिवसा पैकी २८० दिवस बलात्काराच्या घटना, अत्याचार झाले आहेत. सरकारचे अपयश आहे. लाडक्या बहिणी लोकसभेनंतर झाल्या असून पैसे देऊन तेलाचा भाव वाढवल्याचा आरोप त्यांनी केला. खोके सरकार भ्रष्ट असल्याची टीका त्यांनी सरकारवर केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महीला अध्यक्षा स्वाती पोकळे, मतदार संघाचे अध्यक्ष आशिष माने, शैलेश राजगुरू, निता गलांडे, राजेंद्र खांदवे, ह.भ.प पंकज महाराज गावडे आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व स्वागत सुनील खांदवे-मास्तर यांनी केले.