नगर महामार्गावर विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे
विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी उपाययोजना करण्याची सामाजिक कार्यकर्ते गणेश दाभाडे यांची निवेदनाद्वारे मागणी

पुणे : पुणे-नगर महामार्गावर वाघोली येथे रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघोली येथे वाघेश्वर चौकासह महत्वाच्या ठिकाणी भुयारी मार्ग, स्कायवॉक किंवा अन्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश दाभाडे यांनी पुणे मनपा आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त, सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वाघोली येथे रोजच्याच वाहतूक कोंडीने वाहनधारकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. बेशिस्त वाहतूक यामुळे पुणे-नगर महामार्गावर अनेकांना अपघातांमध्ये आपले प्राण गमवावे लागले आहेत. महामार्गाच्या दोन्ही बाजूने शाळा असल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेवून रस्ता ओलांडावा लागतो. विद्यार्थी घरी येईपर्यंत पालक चिंतेत असतात. गेली अनेक वर्षांपासून मागणी होत असताना सुस्त प्रशासन व लोकप्रतिनिधी नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत. विद्यार्थ्यांसह जेष्ठ व महिलांना सुद्धा रस्ता ओलांडावा धोका पत्करावा लागत आहे. यापूर्वी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांना रस्ता ओलांडण्यासाठी स्कायवॉक अथवा तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना कराव्या अशी मागणी करण्यात आली होती. परंतु त्यांनी एनएचआयकडून प्रकल्प आराखडा तयार करण्यात आला असताना मधेच काही प्रोसेस करता येणार नसल्याचे सांगितले होते. उड्डाणपूलाचे काम सुरु होण्यासाठी अजून बराच अवधी आहे. त्यामुळे तात्काळ विद्यार्थ्यांसह जेष्ठ नागरिक, महिलांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. पुणे-नगर महामार्गावर अनेकांना नाहक अपघातांमध्ये जीव गमवावा लागला आहे. अजून किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल अशी तीव्र भावना दाभाडे यांचेसह पालकांनी व्यक्त केली आहे. विद्यार्थी, जेष्ठ, महिला, विकलांग बांधवांसाठी तरी रस्ता ओलांडण्यासाठी तापुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी गणेश दाभाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर असंख्य पालकांच्या सह्या देखील आहेत. पीएमआरडीए क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय सहा. राहुल पवार यांना निवेदन देण्यात आले असून वरिष्ठांना याबाबत कळवणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
पुणे-नगर रोडवर नित्याच्याच वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांसह नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्ता ओलांडताना धोका पत्करावा लागतो. विशेषतः विद्यार्थी, विकालंग बांधव यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अतिशय गंभीर बनला झाला आहे. त्यामुळे महत्वाच्या ठिकाणी रस्ता पार करण्यासाठी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.
– बाळासाहेब (गवळी) सातव (उपाध्यक्ष, पुणे शहर राकॉ, शरद पवार गट)
पुणे-नगर महामार्गावर वाघोली येथे विद्यार्थी, अंध, अपंग बांधव, महिला यांना रस्ता ओलांडण्यासाठी गेली अनेक वर्षांपासून कसल्याही सुरक्षितेच्या उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. उड्डाणपूलाचे कारण पुढे करून प्रशासन चालढकल करत आहे. लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अन्यथा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. – करण थोरात (पुणे जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस)